प्रा.सचिन माथेफोड,पुणे
आळंदी म्हातोबा–कुंजीरवाडी दरम्यानचा मुख्य रस्ता अपूर्ण अवस्थेत राहिल्याने नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना रोजचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात हा रस्ता दलदलीत परिवर्तित झाला असून, चिखल व पाण्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी तक्रारी करूनही रस्त्याचे अपूर्ण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराने काम अर्धवट सोडल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. “काम पूर्ण न करता कंत्राटदार पसार, पण जनता मात्र खड्ड्यांत अडकली,” अशी बोचरी टीका शेतकऱ्यांनी केली आहे.
पुढे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आल्या असताना, या रस्त्याच्या स्थितीमुळे जनतेत रोष आहे. पुढाऱ्यांना आता “हांजी-हांजी” करून ग्रामस्थांची नाराजी शांत करावी लागणार आहे.
दरम्यान, रस्त्यालगतच्या दुकानदार व वाहनचालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उरलेले रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे.
📸 छायाचित्र: अपुऱ्या दर्जाचे व अर्धवट रस्ता काम — आळंदी म्हातोबा-कुंजीरवाडी मार्गावरील खड्ड्यांची दैनंदिनी.
















