सचिन माथेफोड,पुणे
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित, डॉ. शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर, बारामती येथील कृषिकन्या देऊळगाव रसाळ येथे तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या असून, त्यांचे गावात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमात विशाखा अमृतकर, जान्हवी बागल, केशवी गायकवाड, समिधा जाधव, सृष्टी काळुखे, काजल माने आणि मानसी चौधरी या विद्यार्थिनी सहभागी आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. मीराबाई रसाळ, उपसरपंच दत्तात्रय वाबळे तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ पार पडला.
स्वागतप्रसंगी कृषिकन्यांनी संस्थेचे प्रतीक असलेले रोपटे देऊन मान्यवरांचे अभिनंदन केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाची माहिती दिली तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस कसा हातभार लावू शकतो, यावर मार्गदर्शन केले.
गावातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असून, शेतीतील कीड व रोग व्यवस्थापन, तसेच पारंपरिक व नवकल्पनांचा अभ्यास केला जाईल, असे कृषिकन्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसमोर सोयाबीन बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले आणि बीजप्रक्रियेचे महत्त्व समजावून सांगितले. या उपक्रमामुळे गावातील शेतीच्या प्रगतीस निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
अशा प्रकारे कृषिकन्यांच्या सहभागाने व मार्गदर्शनाने संपन्न झालेला हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.



















