प्रा सचिन महाराज माथेफोड
मांजरी खुर्द : प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठान, मांजरी खुर्द यांच्या वतीने आयोजित तिरुपती बालाजी दर्शन यात्रेने अभूतपूर्व असा विक्रम रचत इतिहासात पहिले पान लिहिले आहे. तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेमध्ये एकाच वेळी तब्बल १५०० भाविकांचे दर्शन संपन्न झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचे स्पष्ट झाले. कुठलीही विशेष योजना न करता योगायोगाने घडलेल्या या घटनामुळे भाविकांमध्येही प्रचंड समाधान व आनंदाचे वातावरण आहे.
ही भव्य यात्रा ३ डिसेंबर २०२५ रोजी म्हातोबाची आळंदी येथून मोठ्या उत्साहात प्रस्थान झाली. गावातील सुमारे १५०० भाविक या यात्रेत सहभागी झाले होते. यात्रेसाठी २७ आराम बस, तसेच आयोजनासाठी आवश्यक चारचाकी वाहने सोबत होती. संपूर्ण मार्गावर आपत्कालीन परिस्थितीसाठी तज्ञ डॉक्टरांची टीम व रुग्णवाहिकेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
भाविकांच्या सोयीसाठी प्रत्येक ठिकाणी जेवण, नाश्ता, चहा-पाणी याची उत्तम आणि शिस्तबद्ध सोय केली होती. तसेच निवासाची सोयही काळजीपूर्वक उपलब्ध करून देण्यात आली.
“इतिहास घडेल अशी कल्पनाही नव्हती; परंतु हे सर्व बालाजींच्या कृपेने घडले,” अशी भावना प्रकाशशेठ सावंत प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्री. प्रकाशशेठ सावंत यांनी व्यक्त केली. संपूर्ण यात्रेदरम्यान सौ. पुष्पलता (सीमाताई) प्रकाशशेठ सावंत या स्वतः सर्व भाविकांच्या जेवण, नाश्ता आणि राहण्याच्या सोयींसाठी सतत तत्पर होत्या.त्याचसोबत योगेश काकडे देखील संपूर्ण वेळ या यात्रेत सहभागी होऊन यात्रेकरूंच्या प्रवासात त्यांची काळजी घेत होते. सर्वांना एकाच वेळी दर्शन मिळाल्याने त्यांनीही अत्यानंद व्यक्त केला.
ही यात्रा श्रद्धाळूपणाचे, उत्तम व्यवस्थापनाचे आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.
















