सचिन माथेफोड,थेऊर
थेऊर (ता. हवेली) — पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाने थेऊर परिसरात राजकीय वातावरण तापले. आव्हाळवाडी–थेऊर गटातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार हजारोंच्या संख्येने एकवटल्याने संपूर्ण परिसरात भगव्या लाटेचे चित्र दिसून आले.
मंगळवार, दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी, थेऊर येथे हा भव्य प्रचार शुभारंभ सोहळा पार पडला. यावेळी दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल दादा कुल तसेच भाजप पुणे (उत्तर) जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप दादा कंद यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात हवेली पंचायत समिती गट क्रमांक १७ चे उमेदवार ह. भ. प. योगेश दत्तात्रय काकडे, पुणे जिल्हा परिषद गट क्रमांक ४० च्या उमेदवार सौ. पुष्पलता प्रकाश सावंत आणि हवेली पंचायत समिती गट क्रमांक ८० च्या उमेदवार सौ. पुनम अशोक गायकवाड यांचा अधिकृत प्रचार शुभारंभ करण्यात आला.
नेत्यांचे ठाम संदेश, कार्यकर्त्यांत जोश
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भाजप सरकारच्या विकासकामांचा आढावा घेत मतदारांशी थेट संवाद साधला. “कामाचा माणूस, हक्काचा माणूस” या भूमिकेतून आव्हाळवाडी–थेऊर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजप उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.
नवनाथ काकडे यांनी, “आराध्य दैवत श्री चिंतामणी मंदिरात शपथ घेऊन कोण मागे फिरले याचा विचार करा,” असे सांगत भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
काकासाहेब सातव यांनी, “मतपेट्या उघडतील तेव्हा काकासाहेबांचे काम दिसेल,” असा ठाम दावा केला.
विकास कांचन म्हणाले, “मी पंचायत समितीसाठी इच्छुक होतो, मात्र प्रदीप दादा कंद यांचा शब्द मानून माघार घेतली. आता सर्व भाजप उमेदवारांना माझा जाहीर पाठिंबा आहे.”
मोहन कुंजीर यांनी, “आता सर्वांचे लक्ष कमळाकडे आहे, त्यामुळे जागरूक राहून कमळ निवडून आणा,” असे आवाहन केले.
उमेदवारांची स्पष्ट भूमिका
पंचायत समिती उमेदवार योगेश काकडे म्हणाले, “कृषी सेवेच्या माध्यमातून मी तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलो आहे. दिलेला शब्द कधीही फिरवणार नाही; ईमानदारीने सेवा करेन. मला एक संधी द्या.”
पूनम गायकवाड यांनी, “तुमच्या सेवेसाठी ही निवडणूक लढवत आहे. तुमच्या साथीची गरज आहे. बहुमताने आम्हाला निवडून द्या,” असे सांगितले.
पुष्पलता सावंत म्हणाल्या, “आम्ही केवळ निवडणुकीपुरती आश्वासने देणार नाही, तर कायमस्वरूपी सेवा करण्याचा वसा घेतला आहे.”
प्रकाश सावंत यांचे भावनिक भाषण
प्रकाश सावंत यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ज्या पक्षात मी २०–२५ वर्षे प्रामाणिकपणे काम केले, तिथे तिकीट मिळाले नाही; पण मला खंत नाही. जनता हाच माझा पक्ष आहे. राहुल दादा कुल व प्रदीप दादा कंद यांच्या आग्रहाने भाजपमध्ये प्रवेश केला. मी पैलवान आहे; दिलेला शब्द पैलवान कधी मोडत नाही. हजारो पैलवान घडवत आहे, त्यात महिला पैलवानही आहेत. नावासाठी नाही, तर समाजसेवेसाठी मी ही निवडणूक लढवत आहे.”
पूनम चौधरी यांनी “भारत माता की जय”चा जयघोष करत, “एक घर चांगले करायचे असेल तर स्त्री सक्षम असावी; आणि भाजपच्या महिला उमेदवार सक्षमतेने तुमच्या सेवेसाठी सज्ज आहेत,” असे मत मांडले.
तात्यासाहेब काळे यांनी, “या सहा गावांच्या विकासासाठी खरी फिल्डिंग नवनाथ काकडे यांनी लावली. प्रकाश सावंत प्रसिद्धीपासून दूर होते, आता त्यांना ताकद देण्याची वेळ आली आहे. यात्री निवास, थेऊरचे रस्ते व थेऊर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. गुलाल उधळण्यासाठी दादा परत या,” असे आवाहन केले.
प्रदीप कंद
आजपर्यंतच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत थेऊर मध्ये एवढी मोठी सभा मी पाहिली नाही.तुम्ही अशीच साथ द्या परिसराचा पहा कसा विकास होतो.अनेक उमेदवारांनी माझ्या शब्दाला किंमत देत आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्याबद्दल त्यांचे आभार.
आमदार राहुल कुल यांचा विकासाचा अजेंडा
पुणे–सोलापूर रोड व नगर रोडवरील उड्डाणपूलांना मंजुरी मिळाली असून रिंगरोडचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. बेबी कॅनॉलचे अस्तरीकरण सुरू असून यवतपर्यंत मेट्रो नेण्याचे प्रयोजन आखण्यात आले आहे. पुरंदर विमानतळाचे कामही मार्गी लागत असल्याने परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.राज्यभर यश मिळाल्यानंतर आता पुढचा टप्पा म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. कारखान्यांपासून रस्त्यांपर्यंत, शेतकरी ते नागरिक—सर्वांनाच सर्वांगीण सहकार्य करण्याचा निर्धार राहुल कुल यांनी व्यक्त केला आहे.
हजारोंची उपस्थिती, भाजपची ताकद ठळक
कार्यक्रमाला महिला भगिनी, युवक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभली. या प्रचंड प्रतिसादामुळे आव्हाळवाडी–थेऊर गटात भाजपची संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून आली असून, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भगव्याचा झेंडा फडकणार असल्याचा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



















