प्रा सचिन माथेफोड
– थेऊर आल्हाळवाडी,उरुळी कांचन गटात समिकरणे बदलत असली, उमेदवारांचे दारोदार प्रचार वाढत असले तरी अंतिम क्षणी ‘किंगमेकर’ ठरणार ते गावपुढारीच, असा सुर आता संपूर्ण भागात उठू लागला आहे. पारंपरिक नेटव्यवस्था व घराघरात असलेला प्रभाव पाहता उमेदवारांनीही गावपुढाऱ्यांना साधण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत.
गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाचा मोठा वापर वाढला असला तरी ग्रामीण भागात अजूनही गावपुढाऱ्याच्या शब्दालाच अंतिम शिक्कामोर्तब मानले जाते. मतदार कोणाला झुकलेत, कोणाची पकड अधिक मजबूत आहे, याचा अंदाज गावपुढारीच अचूकपणे लावतात. त्यामुळे उमेदवारांनी सभा, मेळावे, जनसंपर्क दौरे करत असताना गावपुढाऱ्याच्या दारात थांबणे त्यांना अपरिहार्य झाले आहे.
गावपुढाऱ्यांचा वाढलेला प्रभाव
थेट संपर्क मोहिमेत उमेदवार जात असले तरी ते प्रभावी ठरत नाही; शेवटचा शब्द गावपुढारीच देतात, असा सूर स्थानिक पातळीवर उमटत आहे. अनेक वाड्या- वस्त्यांत गावपुढारीने पाठीशी घातलेल्या उमेदवारांनाच मोठा मतांचा ओघ मिळण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवतात.
मतदारांचे कल जाणणारे अनुभवी डोळे
उमेदवारांची संख्या वाढली असली, समीकरणे बदलली असली तरी मतदारांचा गतीमान कल गावपुढाऱ्यांइतक्या अचूकपणे कुणालाच समजत नाही. कोणत्या कुटुंबाचा कोणाकडे कल आहे, कोण नाराज आहे, कोणाला पुन्हा विश्वासात घ्यावे लागेल—हे सर्व ‘किंगमेकर’ गावपुढारीच ठरवणार, अशी चर्चा आहे.
आरक्षण, पक्षांतर, तणाव… तरी निर्णायक गावपुढारीच!
आरक्षण आणि पक्षांतरामुळे वातावरण तापले असले तरी शेवटचा निर्णय देणारे गावपुढारीच, असा विश्वास मतदारांत दिसतो. महिलांचा सहभाग वाढत असला तरी बहुतेक घरोघरी अंतिम भूमिका घरातील ज्येष्ठ किंवा गावपुढारी सांगतात. त्यामुळे उमेदवार सोशल मीडिया, मोठे पोस्टर, मेळावे यांच्या जोरावर प्रचार करत असले तरी निवडणुकीचे पारडे गावपुढारीकडेच झुकलेले दिसत आहे
गावकऱ्यांच्या अडचणी आणि टीका
गावात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या मूलभूत सुविधांच्या कामांकडे उमेदवारांनी पाठ फिरवली आहे, अशी गावकऱ्यांची तक्रार.
रस्ते, पाणी आणि नाले यांसारख्या प्राथमिक समस्यांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने मतदारांत नाराजी वाढली आहे.
फक्त निवडणुकीच्या तोंडावर विकासाच्या आश्वासनांचा पाऊस पडतो, पण निवडून गेल्यावर ते आश्वासन धुळीस मिळतात, असा आरोप ग्रामस्थांचा.
गावातील बेरोजगार तरुणांची परिस्थिती बिकट असून त्यांच्यासाठी ठोस योजना देण्याऐवजी उमेदवार केवळ राजकारणाची भाषा बोलत आहेत.
कोट्यवधींचे निधी कुठे जातात याबाबत ग्रामस्थांना आजपर्यंत कोणतेही पारदर्शक उत्तर मिळालेले नाही.
काही उमेदवारांना गावाच्या वास्तविक गरजा समजून घेण्यापेक्षा सोशल मीडियावरील प्रमोशन महत्त्वाचे वाटत असल्याची टीका.
ग्रामविकासाच्या नावाखाली कागदोपत्री कामे दाखवली जातात, मात्र प्रत्यक्षात गावाच्या समस्या जसाच्या तशाच असल्याचे चित्र.
ग्रामसभा केवळ औपचारिकतेपुरत्याच घेतल्या जातात; ग्रामस्थांच्या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप.
निवडणुकीनंतर पुन्हा पाच वर्षे गावकऱ्यांना भेटायला कोणी येत नाही, ही जनतेची सर्वात मोठी नाराजी.
बदल आणि विकासाची भाषा मोठी, परंतु कामांची गती शून्य — त्यामुळे मतदार आता गंभीर प्रश्न विचारू लागले आहेत.



















