आळंदी म्हातोबा येथील ऋषिकेश वाल्मीक जवळकर हा शेतकरी कुटुंबातील तरुण नुकताच MBBS ही पदवी घेऊन डॉक्टर झालेला असून त्याने आपला हा प्रवास top 7 न्यूज सोबत साजरा केला.त्याचा हा प्रवास त्याच्याच शब्दात याठिकाणी आहे.
28 एप्रिल 2025 — हा केवळ एका पदवी समारंभाचा दिवस नव्हता. हा दिवस होता माझ्या आयुष्यातील एका प्रदीर्घ संघर्षाच्या, कष्टाच्या आणि निष्ठेच्या प्रवासाची पावती मिळण्याचा. याच दिवशी लोकमान्य टिळक नगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई (सायन हॉस्पिटल) येथे माझा एमबीबीएस पदवी समारंभ संपन्न झाला. या समारंभाला अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तो क्षण माझ्या जीवनातील एक अत्यंत गौरवशाली आणि भावनिक टप्पा होता.
मी पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची या छोट्याशा गावातला. माझे प्राथमिक शिक्षण एंजल हायस्कूल येथे झाले आणि त्यानंतर MIT ज्युनियर कॉलेज मधून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. MIT मध्ये मला पहिला क्रमांक मिळाला, पण NEET परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही. ती वेळ मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण होती. अपयशाने खचून न जाता मी स्वतःला सावरले, आत्मपरीक्षण केले आणि एक दृढ निश्चय घेतला — एक वर्षाचा drop घेऊन पुन्हा प्रयत्न करण्याचा.
त्या एका वर्षात मी स्वतःशी सतत झगडत होतो — दिवस-रात्र अभ्यास, आत्मसंशय, तणाव, पण याच काळात मला खंबीर साथ मिळाली माझ्या कुटुंबाची. माझे काका श्री. दामोदर जवळकर हे माझ्या यशाचे खरे शिल्पकार आहेत. त्यांनी प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी उभे राहून मला खंबीरपणे लढण्याची प्रेरणा दिली. मावशी अंजली जवळकर यांनी नेहमी सकारात्मकतेचा ऊर्जा स्रोत बनून मला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. वडील वाल्मीक जवळकर आणि आई नंदा जवळकर यांचं प्रेम, विश्वास आणि मूक पाठबळ हेच माझ्या संघर्षाला उर्जा देत होतं.
पुनः NEET दिल्यानंतर मला लोकमान्य टिळक महापालिका वैद्यकीय महाविद्यालय व सर्वसाधारण रुग्णालय, मुंबई या प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. तिथे सुरू झाला एक नवा टप्पा – वैद्यकीय शिक्षणाचा, सेवाभावाचा आणि आत्मशिस्तीचा. या पाच वर्षांच्या काळात मी फक्त डॉक्टर होण्याचे शिक्षण नाही घेतले, तर माणूस म्हणूनही घडत गेलो.
या यशाचे श्रेय फक्त माझे नाही. हे माझ्या Angel High School, MIT Junior College, Jha Educational Services, आणि LTMMC येथील सर्व शिक्षक व मार्गदर्शकांचे आहे. माझ्या MIT व मेडिकल कॉलेजमधील मित्रांनी प्रत्येक कठीण प्रसंगी मला आधार दिला, आत्मविश्वास दिला. पण माझ्या यशामागचा खरा प्रेरणास्रोत होता — माझे काका दामोदर जवळकर. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी पुन्हा उभा राहिलो, पुन्हा लढलो आणि अखेर यश मिळवले.
आज जेव्हा मी या प्रवासाकडे मागे वळून पाहतो, तेव्हा हे लक्षात येते की अपयश हे अंतिम नसते, तर पुन्हा उठून लढण्याची तयारीच यशाची खरी नांदी असते. माझ्या यशाची ही कहाणी इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा ठरेल, हीच अपेक्षा.
















