सचिन माथेफोड,पुणे
आळंदी म्हातोबा व कुंजीरवाडी (ता. हवेली) या गावांना जोडणाऱ्या २४९ क्रमांकाच्या ३३ फूट रुंदीच्या ग्रामीण शिवरस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. या अतिक्रमणामुळे रस्त्यावर वाहतूक ठप्प होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. याबाबत योग्य कारवाई करून हद्द कायम करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी १३० सह्यांचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे सादर केले. सदर रस्ता नकाशाप्रमाणे अधिकृत असून तो परिसरातील सुमारे दोन हजार लोकसंख्येसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरुन शेतकरी, नर्सरीधारक, रहिवासी यांची नियमित वाहतूक सुरू असते. मात्र अतिक्रमणामुळे रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा व शेतीमाल वाहतूक अडथळ्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने या प्रकरणी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मा.उपसरपंच सायली शिवरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डुडी यांनीही याबाबत योग्य चौकशी करून लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देणाऱ्यांमध्ये माजी उपसरपंच सायली शिवरकर, तेजस शिवरकर, संदिप शिवरकर (सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद), गणेश शिवरकर, प्रमोद, मयूर, जीवन, सनी शिवरकर यांचा समावेश होता. हे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, उपविभागीय अधिकारी हवेली, अप्पर तहसीलदार लोणी काळभोर, गटविकास अधिकारी हवेली व आळंदी म्हातोबा ग्रामपंचायत प्रशासनाला सादर करण्यात आले.



















